राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली.
राज्यात यंदा ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली असून नाशिक विभागात सर्वाधिक पेरणी झाली आहे, असेही भरणे यांनी सांगितले. खत पुरवठ्याबाबत बोलताना विक्रेत्यांना विनाअनुदानित खते विकता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दूध भेसळीच्या प्रश्नावर भरणे म्हणाले, दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ‘सोनई दूध’ प्रकरणात तपासात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारले असता, हा त्यांच्या पक्षाचा विषय असून हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावा, असे भरणे यांनी सांगितले.
प्रशांत किशोर, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या संबंधांबाबत बोलताना भरणे म्हणाले की, त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. आमच्याकडे असणारे सर्व नेते भक्कम आहेत. सुनेत्रा पवारांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असून त्या निर्णय घेण्यास सक्षम आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सुनील तटकरे चांगले काम करत असून त्यांच्याबाबत कोणाचीही तक्रार नाही, असेही दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या तिरंगा रॅलीचे आमंत्रण अद्याप मिळाले नसल्याचे सांगत, आमंत्रण मिळाल्यास नक्की सहभागी होईन, असेही त्यांनी म्हटले.
Post a Comment